Blog Archive

Sunday, 22 May 2016

कुमार केतकरविषयी चर्चा-सुनिल तांबे

...भाजप-शिवसेना वगैरेंनी त्यांच्या निरुपम,दोन राऊत वगैरे अल्पबुध्दी भाटांना खासदारकी देवून जे सौजन्य आणि शहाणपण दाखवलं ते काँग्रसने ख-या अर्थाने अभ्यासु कुमार केतकरांच्या बाबतीत दाखवलं नाही, हे सत्य आहे.
काँग्रेसच्या सद्य माघारीत हे देखील एक महत्वाचे कारण आहे.देशपातळीवर तुमचे विचार प्रभावीपणे पोहचवणा-यांना तुम्ही योग्य सन्मान देणार नसाल तर मेसेज काय जातो..?
रविंद्र पोखरकर यांची पोस्ट

सुनिल तांबेंची कमेंट
कुमार केतकरांचं लिखाण बारकाईने वाचा. त्यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला नाही. त्यांनी नेहरू-गांधी घराण्याची बाजू घेतलेली आहे. त्यामागची कारणं जाणून घ्या. काँग्रेसमध्ये पुरोगामी वा समाजवादी विचार रुजवणं हे कार्य फक्त नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीच करू शकते कारण काँग्रेसचा वसाहतवाद वा साम्राज्यवादाचा विरोध, सेक्युलॅरिझम आणि सामाजिक न्यायाचा विचार, पुढे नेण्याची जबाबदारी केवळ हे घराणंच पेलू शकतं. काँग्रेसमधील प्रतिगामी, हिंदुत्ववादी विचारांचा निरास करण्याची ताकद केवळ त्यांच्यामध्येच असू शकते. याचा अर्थ असा नाही की हे घराणं पुरोगामी, डाव्या विचारांचं आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्थिती ध्यानी घेऊन केतकर या घराण्याची बाजू लावून धरतात. त्यातला आणखी एक बारकावा असा की सुशिक्षित, मध्यमवर्गय मराठी समाजधुरीण (समाजवादी वा कम्युनिस्ट वर्तुळातील वा त्यांचे सहयात्री) नेहरू-गांधी घराण्याची चिकित्सा वा त्यावर टीका करत असतात. त्यांच्या विरोधात केतकर आपली भूमिका डाव्या परिभाषेत नाही तर डाव्या विचारांच्या परिप्रेक्ष्यात मांडत असतात. केतकरांच्या भूमिका मला पटतात की पटत नाहीत हा मुद्दा अलाहिदा पण त्यांची भूमिका समजून मग त्यावर टीका करायला हवी.
केतकरांना पद्मश्री मिळाली वाजपेयी पंतप्रधान असताना. केतकर हे पत्रकार आहेत, त्यातही त्यांचा रस लिखाणात आहे. म्हणूनच त्यांनी वृत्तवाहिनीचं संपादकपद नाकारलं. त्यांना राज्यसभेत खासदार बनण्यात रस नसावा असं मला वाटतं. कारण त्यांची बांधिलकी लेखनाशी आहे. खासदार बनल्यानंतर वेगळी जबाबदारी येते त्यामध्ये त्यांना विशेष रस नसावा. खासदारकीपेक्षाही पत्रकारितेतली आपली ओळख आणि सत्ता यामधून त्यांचे उद्देश अधिक सफल होतात अशी त्यांची धारणा असावी.  जिज्ञासूंनी केतकरांची पुस्तकं अवश्य वाचावीत, विशेषतः ज्वालामुखीच्या तोंडावर.
मी केतकरांचं लिखाण सहसा चुकवत नाही. त्यांची मतं वा भूमिका मला पटतात की नाही हा क्षुल्लक मुद्दा आहे. मी त्यांच्यावर (बहुध एकमेव पत्रकार) जाहीरपणे टीकाही केली आहे. पण तोही महत्वाचा मुद्दा नाही. केतकरांची वैचारिक बांधिलकी पुरोगामीत्वाशी म्हणजेच युरोपियन आधुनिक विचारांशी आहे. त्यामध्ये तत्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी अनेक विषय येतात. वैचारिकदृष्ट्या केतकरांची जडण-घडण श्रीपाद अमृत डांगे आणि लाल निशाण पक्ष यांनी केली आहे.  असो.

Friday, 20 May 2016

पुस्तकातून गांधी नेहरूंना हटवलं की ते संपतील असा बिनडोक विश्वास जे बाळगू शकतात त्यांच्या बुद्धीदारिद्र्याची फक्त कीवच केली जाऊ शकते!

पुस्तकातून गांधी नेहरूंना हटवलं की ते संपतील असा बिनडोक विश्वास जे बाळगू शकतात त्यांच्या बुद्धीदारिद्र्याची फक्त कीवच केली जाऊ शकते!

ज्यांच्यामुळे इंग्रजांना पळून जावं लागलं ते इंग्रजांच्या तत्कालिन साजिंद्यांच्या आजच्या कारस्थानांमुळे नामशेष होण्याची अजिबातच शक्यता नाही.

इतिहासाच्या पुस्तकावरच ज्यांचा इतिहास आजवर ठरत आला, इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला स्थान नाही याची खंत ज्यांना आयुष्यभर बाळगावी लागली त्यांच्याकडून या गोष्टी होणारच हेही आपण गांधीजींच्या सहनशील वृत्तीनं समजून घेतलं पाहिजे. वैचारिक दूर्बलांना सूड उगवण्याची तीच तर एक जागा आहे!

एक विशिष्ट विचारसरणी वगळता गांधी-नेहरू भारतीयांच्या  ह्रदयात राहतात, पुस्तकात नाही. भारतीय माणसांच्या ह्रदयाचा कप्पा हा यांच्या बेगडी पुस्तकांपेक्षा मोलाचाच आहे.
विश्वंभर चौधरी

नेहरु जबाबदारी

देशाच्या कानाकोप-यातील तळागाळातील एकेक माणूस संघटीत करून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून ती सतत तेवत ठेवणे. त्यातून स्वांतंत्र्यप्राप्ती करून आर्थिक सामाजीक समतेवर सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन देशाच्या निर्मितीचे स्वप्न पुरं करण्याची सुरूवात गांधी नेहरू पटेल यांनी केली . पण पटेल, गांधी याच्या लवकर झालेल्या मृत्यूमुळे ती संपुर्ण जवाबदारी नेहरूंवर पडली आणि ती त्यांनी सशक्तपणे पार पाडली. जो काम करतो त्याच्या कामात कांही त्रुटी राहतात कांही चुकाही घडतात पण एकंदर पाहता नेहरूंचे योगदान खूपच महान आहे. पण खूप कार्य करणारा माणूस श्रेयाच्या बाबत नेहमी उपेक्षित राहतो, ही जगरूढ आहे. यशस्वी संसार करून, मुलंबाळं रांगेला लागूनही, सर्व कांही सुखसंपन्न असताना ' मला माझ्या वडिलांनी कित्येक चांगली स्थळे आणली होती, पण मी म्हणून सर्व निभाऊन नेतेय ' ' तुझ्या ऐवजी ती पसंत केली असती तर माझं फार भलं झालं असतं ' असे संवाद पन्नाशीकडे झुकलेल्या पतीपत्नीत ऐकायला मिळतात. आहे त्या बाबीतील सुखाकडे दुर्लक्ष करून नसलेल्या बाबींचे आकर्षण ही मानवी मनाचा सहज स्वभाव आहे. देशाचा पंतप्रधान कोण असायला हवा, हा विचार याच पद्धतीच्या सहज भावनेतून आलेला आहे,_Raj kulkarni

None of the Americans objected this naming to roads streets and other places like drunk Rushi kapoor

None of the Americans objected this naming to roads streets and other places like drunk Rushi kapoor

...https://en.wikipedia.org/wiki/Memorials_to_John_F._Kennedy

https://en.wikipedia.org/wiki/List_of_places_named_for_Thomas_Jefferson

https://en.wikipedia.org/wiki/List_of_things_named_after_Franklin_D._Roosevelt

https://commons.wikimedia.org/wiki/Category:Things_named_after_Abraham_Lincoln

https://en.wikipedia.org/wiki/List_of_places_named_after_people_in_the_United_States

सोमालिया केरळ

दोन दिवस लिहायचे होते पण वेळ नव्हता. सोमालियाचे मूळ नाव सोमालय आहे. सोम ही प्राचीन वैदिक देवता आहे. तसेच शंकराला सोमेश्वर किंवा सोमनाथ म्हणतात आणि काही वेळा शंकरालाच सोम म्हणतात. त्यामुळे सोमालिया हे आलय म्हणजे सोमाचे घर म्हणजेच देवांचे घर असा अर्थ निघतो. तसेच भारतवर्षातील केरळ ही भूमी देवभूमी म्हणून केरळ टुरिजम जाहिरात करत असतो. मग सोमालिया आणि केरळची तुलना केली तर लोकांना राग येण्याचे काय कारण आहे. उलट एका देवभूमीची दुसऱ्या देव्भूमिबरोबर तुलना करून हा 'अखंड भारताचा' एक तुटलेला दुवा दाखवून दिल्याबद्दल आपला उर अभिमानाने भरून आला पाहिजे. तसेच अशी तुलना करणारा हा कोणी सामान्य मनुष्य नसून तो एक इतिहास तज्ञ आणि 'संपूर्ण राज्यशास्त्रातील' विशारद आहे हेच सिद्ध होते.
साभार-फेसबुक

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....
1) मोतीलाल नेहरू यांनी मिठाच्या सत्त्याग्रहात 2 वर्ष तुरुंगवास भोगला! 
2) जवाहरलाल नेहरू यांनी  एकूण 9 वर्षाचा तुरंगवास भोगला
3) एक वेळ तर मोतीलाल आणि जवाहर दोघेही बापलेक कारागृहात होते ,त्यावेळी जवाहरलाल यांच्या मातोश्री स्वरूपराणी नेहरू यांनी कॉग्रेस च्या कामाची धुरा सांभाळली. मोतीलाल नेहरू दिवंगत झाल्यावर, जवाहरलाल कारागृहात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत स्वरूपराणी नेहरू जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या व पोलिस मारहाणीत त्या मृत झाल्या म्हणून बातमी पसरली होती.  नेहरू कारागृहामधे असल्यामुळे आईला भेटायला जाऊ शकले नाहीत.
4) जवाहरलाल यांच्या पत्नी कमला नेहरूंनी प्रकृती साथ देत नसताना सुद्धा 1  वर्ष कारावास भोगला आणि आजार पण वाढले म्हणूनच त्यांची सुटका झाली ,
5)  मुलगी इंदिरा गांधी यांना  भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात, नवदांपत्य तुरूंगात होते.
6) जावई फेरोज गांधी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान सहभाग घेतल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगली.
7) जवाहरलाल यांची सर्वात धाकटी बहिण कृष्णा हाथीसिंग यांनी 2  वर्षाचा कारावास भोगला. 
8) जवाहरलाल यांच्या पेक्षा धाकटी असणारी विजयालक्ष्मी पंडित यांनी 3  वर्षाचा कारावास भोगला .
9) विजयालक्ष्मी यांचे पती रणजीत सीताराम पंडित यांना 3 वर्षाची सजा झाली, त्यापैकी अडीच वर्ष त्यांनी भोगली कारण 1944 साली  कारागृहात शिक्षा भोगत असतानाच ते  मरण पावले .
10) मोतीलाल यांचा पुतण्या ब्रिजकुमार नेहरू आणि त्यांची पत्नी रामेश्वरी नेहरू यांनी ही 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग घेतला .
ही देखील घराणेशाहीच आहे ना , या घराणेशाही बद्दल तर कोणीच बोलायला तयार नाही.
© राज कुलकर्णी.

नेहरू-सरदार पटेल (कुरुंदकरांच्या दृष्टीतून)- Vishwambhar Choudhari

नेहरूंनी सरदार पटेल यांना पाण्यात पहिले आणि पंतप्रधान होऊ दिले नाही असा एक अतिशय प्रसिद्ध सिद्धांत काही लोक नेहमी हिरीरीने सांगत असतात. सरदार पटेल स्वत: कोणी कच्च्या गुरुचे चेले नसून नेहरू यांच्यासारखेच उच्च विद्याविभूषित बॅरिस्टर आहेत ! नेहरू आणि सरदार यांच्यातील सत्ता समतोल बघितला तरी नेहरू यांनी पटेलांना डावलले हा सिद्धांत खोटा ठरतो. त्या बद्दल कुरुंदकर या लेखात लिहितात:
...... “नेहरू वाटतात तितके डावे नव्हते, ते मध्यकेंद्राच्या डावीकडे होते. सरदार वाटतात तितके उजवे नव्हते. ते मध्य केंद्राच्या उजवीकडे होते”
“महाराष्ट्रात सरदारांची खास माणसे म्हणून जी ओळखली जात त्यात मुंबईचे स.का. पाटील होते. सरदारांच्या मृत्युनंतर ते खासदारही झाले, मंत्रीही झाले. त्यांची शक्ती वाढलीच. मोरारजी देसाई सरदार गटाचे होते. त्यांचीही प्रतिष्ठा वाढतच गेली. सरदारांच्या मृत्युनंतर सरदार गटाचे राजगोपालाचारी गृहमंत्री झाले. सरदार गटाचेच राजेंद्रप्रसाद दीर्घकाळ राष्ट्रपती होते. गोविंद वल्लभ पंत हे स्वातंत्र्यपूर्व काळात कधीच नेहरू गटाचे प्रवक्ते नव्हते. रविशंकर शुक्ला यांचाही नेहरू गट नव्हता. ही यादी वाटेल तितकी वाढविता येण्याजोगी आहे. नेहरूंच्या कारर्कीर्दीत नेहरूवादी मानल्या गेलेल्या काही लोकांचाही अस्त झाला. स्वामी रामानंद तीर्थ हे याचे उदाहरण आहे. तसा काही सरदार पटेल गटातील लोकांचाही अस्त झाला. राजकारणात असे चढ-उतार होतच असतात. त्यांचा गटाशी संबंध नसतो. त्याची कारणे इतर असतात. पुढे चालून भारताचे पंतप्रधान झालेले लाल बहादूर शास्त्री सरदारांच्या मृत्यूपर्यंत नेहरू गटात नव्हते.”
गांधीजींनी नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी सरदारांना डावलले का? डावलले असेल तर त्यामागे काय विचार होता? याची समीक्षा करतांना कुरुंदकर म्हणतात की स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान हिंदी भाषिक त्यातही सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाच असावा हा कॉंग्रेस रणनीतीचा एक भाग समजला पाहिजे. सुभाष बाबू किंवा सरदार पटेल हे भाषिक-दृष्ट्या अल्पसंख्य राज्याचे प्रतिनिधी आणि नेहरू उत्तर प्रदेशचे म्हणून नेहरूंना प्राधान्य दिले गेले असा हा तर्क आहे. या विषयी गांधी-सरदार-नेहरू यांच्यात मतभेद होते का यावर मत देतांना कुरुंदकर म्हणतात-
.....”सरदारांना या वास्तुवादाचे भान होते. जवाहरलाल नेहरू जेनेतेचे लोकप्रिय नेते होते, तरुणांचे नेते होते, अल्पसंख्यांक समाजाचे विश्वासपात्र होते आणि उत्तर भारतीय होते. तेच पंतप्रधान होणार ही गोष्ट स्वाभाविकही आहे व भारतीय अखंडतेसाठी नवजात स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आवश्यकही याची सरदारांना नेहमीच जाणीव होती. “I am there where Bapu put me and I shall remain there as long as Bapu wants so” असे सरदारांनी आपल्या स्थानाचे जाहीर सभेत स्पष्टीकरण केले आहे. या वाक्याचा गर्भित अर्थ असा की नेतेपदी यायचे नाहीनही, संघटनेची सूत्रेच फक्त हाती ठेवायची असा आमचा उभयतांचा एकमताने निर्णय आहे. म्हणून मी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करणार नाही आणि संघटनेची सूत्रेही सोडणार नाही. सरदारांनी श्रेय मात्र नेहमीप्रमाणे बापूंना दिले आहे. गांधीजींचे प्रेम सरदारांवर कमी नव्हते, नेहरूंवर जास्त नव्हते, पण सर्वांच्यापेक्षा भारताच्या भवितव्यावर गांधींचे प्रेम अधिक होते असा याचा अर्थ आहे.”
नेहरू की सरदार असा पेच गांधीजींच्या समोर होता का? तसा तो होता असे दिसत नाही कारण १९४५ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर सरदार मरणोन्मुख अवस्थेत होते. त्यावेळी सरदारांचे वय ७० वर्षे होते (जन्म १८७५) आणि त्या वयात ६० नंतर लोकांनी निवृत्त झाले पाहिजे असा सरदारांचा स्वत:च असलेला आग्रह, अनेक वर्षांपूर्वीच पत्नीच्या मृत्यूने उध्वस्त झालेली कौटुंबिक आस्था, बिघडलेली शारीरिक अवस्था यामुळे स्वत: सरदार पटेल या पदासाठी आग्रही नव्हते. कुरुंदकर लिहितात “ अशाही अवस्थेत अत्यंत कणखरपणे ते वागत गेले हा धैर्याचा भाग आहे. सत्तेचा मोह असण्यासाठी आता जीवनाची शाश्वतीच नव्हती. ४ मार्च १९४८ ला(म्हणजे स्वातंत्र्यानंतर केवळ ७ महिन्यात) त्यांना इतका जोराचा हृदयविकाराचा झटका आला की ते जवळजवळ गेलेच होते. डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली होती तरी त्यातून ते वाचले. त्यानंतर तर त्यांनी सर्वांना सांगितले की ‘आता आजारी असल्याची बातमी येईल अशी आशा करू नका, आता कोणत्याही क्षणी बातमी मृत्यूचीच येईल. मी सुद्धा सकाळी काम करताना संध्याकाळी आपण ते पूर्ण करू ही आशाच सोडलेली आहे. कारण दरक्षणी आम्ही मृत्यूच्या दारात उभे आहोत. जाणत्या वाचकांना हे कळावे की हा झटका गांधीवधानंतर सव्वा महिन्याच्या आत आला आहे तेव्हा क्षोभाचा उगम कुठे असला पाहिजे. हे ही लक्षात घ्यावे की यानंतर सरदार सुमारे २१ महिने जिवंत होते. हा तो काळ नव्हे ज्यावेळी माणूस असलेला नेता बदलून सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न करील” सरदारांचेच एक वाक्य कुरुंदकर उधृत करतात ते म्हणजे ‘इच्छा बाळगण्यासाठी माणूस तरुण आणि निकोप असावा लागतो, आम्ही तसे नाही’.... म्हणजेच गांधीजींना नेहरू की सरदार अशी द्विधा निर्माण होण्याची स्थितीच नव्हती ही गोष्ट लोक लक्षातच घेत नसावेत !
सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का? या मुद्द्यावर कुरुंदकर लिहितात:
“हिंदू मुस्लीम प्रश्नाबाबत सरदारांचे नाव घेऊन लोक फार गोष्टी बोलतात. सरदार कधी हिंदुत्ववादी नव्हते. अखंड भारत टिकवण्यासाठी मुसलमानांना विभक्त मतदारसंघ, विशेष आश्वासन, विशेष अधिकार, राखीव जागा इत्यादी सर्व देण्यास ते तयार होते. वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) यांनी नेते असावे, काश्मिरात शेख अब्दुल्लानी पंतप्रधान व्हावे याला त्यांचा विरोध नव्हता. सर्व मुसलमानांना पाकिस्तान मिळाल्यानंतर सुद्धा बरोबरीचे अधिकार असावेत यावर त्यांनी कधी खळखळ केली नाही, पण इतके सगळे झाल्यानंतर मुसलमानांनी या राष्ट्रावर प्रेम करावे हा त्यांचा आग्रह होता. ते सावरकरांचे अनुयायी किंवा गोळवलकर गुरुजींचे अनुयायी जाहीरपणे तर नव्हतेच पण मनातूनही कधी नव्हते. गांधी नेहरूंची भूमिका मुस्लीमधार्जिणी आहे असा त्यांचा आरोप नव्हता.”
सरदार पटेल यांचे चालले असते तर फाळणी झाली नसती असा एक बावळट युक्तिवाद सरदारांना हिंदुत्ववादी ठरवू पाहणारे हौशी लोक करतात त्यावर कुरुंदकरांनी मांडलेली वस्तुस्थिती अशी आहे “सरदारांनी फाळणीची कल्पना प्रथम मान्य केली असा मौलाना आझादांचा आरोप आहे. फाळणीची कल्पना मूळ माउंटबॅटन यांची. टी प्रथम पटली सरदारांना, नंतर नेहरूंना. शेवटी गांधींना. आपण मात्र शेवट पर्यंत अखंड भारतवादी राहिलो असा दावा मौलानांनी केला केला. दावा खरा आहे. मौलाना अखंड भारतवादी होते, त्यासाठी कोणतीही किंमत देण्यास तयार होते. ३५ कोटी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करून अखंड भारत टिकविण्या इतके स्वप्नांचे प्रेम गांधी-नेहरू-पटेलांना नव्हते. किंमत मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागताच हे तिघेही तुकडे पडण्यास तयार झाले, ही गोष्ट खरी आहे.”
जे हिंदुत्ववादी (?) भावविवश होऊन फाळणीचा विचार करतात आणि आजच्या काळात देखील अखंड भारत वगैरे अशक्य स्वप्ने पाहतात त्यांनी ही समीक्षा आवर्जून वाचलीच पाहिजे.
गांधी आणि सरदार यांचे वैयक्तिक संबंध कसे होते? यावर कुरुंदकर लिहितात- “कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांपैकी ज्यांनी गांधींची व्यक्तिगत सेवा केली, अगदी त्यांचे कपडे धुणे, अंथरून टाकणे असे परीचर्येचे काम केले, असे सरदार एकटेच आहेत. आणि ज्यांची व्यक्तिगत सेवा गांधीना करावी लागली असेही कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सरदारच आहेत.”......”गांधींनी म्हटले आहे : ‘मला सरदारांना काही विचारावेच लागत नाही. माझ्या मनात सरदारांची प्रतिमा आहे, तिला मी विचारतो आणि बहुधा माझ्या मनातील प्रतीमेने जे उत्तर दिले असते ते शरीरधारी माणूसही देतो’ इतके सरदारांचे मत गांधींना परिचित होते. सरदारांची भाषा कधीच हिंसक कधीच नव्हती, गांधी त्यांना ‘अहिंसेचा हिंस्त्र प्रचारक’ असे म्हणत”
*****
Vishwambhar Choudhari

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा -
"सरदार पटेल : कुरूंदकरांच्या नजरेतून...."
नरहर कुरुंदकर यांनी “सोबत”च्या १९७५ च्या दिवाळी अंकात “सरदार पटेल: काही समाज व गैरसमज” या नावाने हा लेख लिहिला होता. तो “आकलन” या पुस्तकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा.लि.). आज सर्वत्र मतांचा गलबला दिसत आहे. हिंदुत्ववादी सरदारांना हिदुत्ववादी ठरवण्यासाठी पेटून उठेलेले आहेत... या सर्व पार्श्वभूमीवर कुरुंदकरांसारख्या विचारवंताचे मत तरुणांसमोर येणे अत्त्यावश्यक असल्याने मी हा ब्लॉग लिहीत आहे

Sunday, 1 May 2016

महात्मा गांधी दोन व्याख्याने

🌹🌹🌹🌹निमंत्रण🌹🌹🌹🌹
---------------------------------------------

"महात्मागांधीदोनव्याख्याने……"

वक्ते …

मा.तुषार गांधी
महात्मा गांधी यांचे पणतू
(लेट्स कील गांधी या पुस्तकाचे लेखक,व्यवस्थापकीय विश्वस्त,महात्मा गांधी फांउंडेशन)
--------------------------------------------


एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितल्याने पुढच्या पिढ्यांना तेच सत्य वाटते, हा इतिहास आहे. महात्मा गांधीच्या विषयात ही गोष्ट प्रकर्षाने लागू होते. महात्मा गांधी यांच्या हत्येला 67 वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबद्दलचा खोटानाटा प्रचार अव्याहतपणे सुरु आहे.  महात्मा गांधीनी देशाची फाळणी घडवली…..त्यांनी 55 कोटी रुपये पाकीस्तानला देण्यास बाध्य केले….ते मुस्लीमधार्जिणे होते……भगतसिंग फाशी जाताना त्यांना वाचवण्यसाठी गांधीनी काहीच केले नाही. अशी अनेक कारणे सांगून गांधींची हत्या समर्थनीय ठरवण्याचा प्रयत्न सतत सुरु आहे. मात्र सत्य सोयीस्करपणे दडविले जात आहे. गांधीचा खुनी नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण करण्याची, त्याला हीरो ठरविण्याची स्पर्धा लागली असताना या सर्व प्रश्नांची खरीखुरी उत्तरं घेण्यासाठी आठवणीनं नक्की या.

--------------------------------------------

उदघाटक
मा.राज कुलकर्णी
(नेहरु चरित्राचे अभ्यासक,उस्मानाबाद),

समारोप

मा.अविनाश दुधे
(आम्ही सारे फाउंडेशन,अमरावती)
-------------------------------------------

रविवार 8 मे 2016
विषय : गांधी हत्येमागील षडयंत्राची कहाणी,
सोमवार 9 मे 2016 :
विषय : गांधी समज व गैरसमज
वेळ : सायंकाळी ६ वाजता
हुतात्मा स्मृती मंदीर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर
आयोजक – आम्ही सारे फाउंडेशन,सोलापूर,

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹