Blog Archive

Wednesday, 14 December 2016

गांधी–एकविसाव्या शतकासाठी*- रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

*गांधी–एकविसाव्या शतकासाठी*- रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
मोहनदास करमचंद गांधी ह्या मर्त्य माणसाच्या जन्माला २०१९ साली दीडशे वर्षे पूर्ण होतील, ह्यात विशेष काही नाही. विशेष बाब हीच आहे की ६८ वर्षांपूर्वी गोळीने ठार केल्यावरही हा माणूस मेला नाही. त्याच्या तथाकथित अनुयायांनी त्याच्या नावाचा जप करत त्याला प्राणाहून प्रिय असणारी मूल्ये पायदळी तुडवली. त्याला विरोधक नव्हे, तर शत्रू मानणाऱ्यांनी शक्य त्या सर्व उपायांनी त्याचे जीवन, कार्य व वारसा संपविण्यासाठी जंग जंग पछाडले. पण म्हातारा काही केल्या संपत नाही. शस्त्राने छेदल्या न जाणाऱ्या व अग्नीत न जळणाऱ्या त्याच्या (महान) आत्म्याच्या रूपाने तो देशात-परदेशात कोठे न कोठे सतत प्रकट होत राहतो. दलितपीडितांसाठी (त्याच्या शब्दात दरिद्रनारायणासाठी) लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा पुरवत राहतो. कधी तो जगड्व्याळ शक्तींशी एकाकी झुंजणाऱ्या हाताना बळ पुरवतो, तर कधी सभोवतालच्या अंधारात लुकलुकणाऱ्या आशेच्या दिव्यात रचनात्मकतेची तेलवात रुजवतो. तो जिवंत असताना स्वतःला आधुनिक म्हणविणाऱ्यानी ‘हे कालबाह्य, जुनाट मॉडेल आहे’ म्हणून त्याची टर उडवली होती, तर परंपरेचे  तथाकथित पाईक ‘हा आमच्या धर्म-संस्कृतीची उज्ज्वल परंपरा उद्ध्वस्त करायला निघाला आहे’ असे म्हणून त्याच्या विरोधात उभे ठाकले होते. पण त्या वेळी स्वतःला सनातनी हिंदू म्हणविणारा हा ‘ईश्वराला सत्य न मानता सत्याला ईश्वर मानणाऱ्या’ धर्माची मुहूर्तमेढ करीत होता, हे कोणाच्या ध्यानातही आले नाही.  आज जगभरात धर्माच्या नावावर अंधश्रद्धा, द्वेष व कट्टरता थैमान घालत आहेत, तर धर्म नाकारणारा ईहवादी (सेक्युलर) विचार उतरणीला लागला आहे. अशा वेळी धर्मापलीकडच्या मानवतेशी व अध्यात्मिकतेशी नाते सांगणारा त्याचा धर्मविचार सर्वधर्मियांना तसेच नास्तिकांनाही जवळचा वाटू लागला आहे. गेल्या शतकातील सारे जुने विचारव्यूह एकविसाव्या शतकात कालबाह्य ठरत असताना त्याच्या अनेक विचारांची सार्थकता, प्रासंगिकता मात्र काळाच्या छातीवर आपली तप्तमुद्रा कोरताना दिसते आहे. गांधी नावाच्या महात्म्याच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्याच्या विचारांचे पुनर्वाचन करण्यास एव्हढे कारण पुरेसे असायला हरकत नाही.
गम्मत म्हणजे २०१९ हे त्याच्या सहचारिणीच्या जन्माचेही दीडशेवे वर्ष आहे (कस्तुरबा त्यांच्यापेक्षा सहा  महिन्यांनी मोठ्या होत्या). पारंपारिक हिंदू पती-पत्नीच्या नात्यापासून सुरू  झालेल्या ह्या भावबंधाने नंतर कितीतरी रूपे घेतली. कितीतरी संघर्ष, पुरुषी अहंकार, धर्म-जातीचे संस्कार, अपत्यांवरील प्रेम व व्यापक समाजनिष्ठा ह्यांतील टक्कर .. हे सर्व पार करून परस्परांना समृद्ध करणारे सहजीवन त्यांतून आकाराला आले. कस्तुरबांनी मोहनदासशी केलेल्या चिवट संघर्षातून त्याला प्रेममय प्रतिकाराचे व स्त्रीशक्तीच्या आंतरिक शक्तीचे सूत्र सापडले. आज सर्वधर्मीय कट्टरपंथीय स्त्रीला ‘चूल, मूल व कर्मकांड’ ह्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्त्रीमुक्तीची चळवळ दिशाहीन झाली आहे व आधुनिकतेच्या वाटेवर फक्त देहात्मकतेचे चकवे आहेत. अशा वेळी दीडशे वर्षांचे बा-बापू आपल्याला स्त्री-पुरुषांमधील सुंदर निरामय  नाते उलगडून दाखवत आहेत.

म्हणूनच गांधी-विचारांशी नाते सांगणारे अनेकजण – व्यक्ती, संस्था, संघटना - गांधी-१५० अभियान सुरु करण्यासाठी धडपडत आहेत. हे अभियान म्हणजे २ ऑक्टोबर २०१९ रोजी महासांगता होणारी  मेगा- इव्हेंट नाही. हा सोहळा नाही कुणा व्यक्तीच्या गौरवाचा किंवा ‘आमचाच नेता थोर’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा. गांधींना अशा सोहळ्याची किंवा समर्थनाची गरज नाही. मात्र त्यांचा वारसा बनू पाहणाऱ्यांच्या दृष्टीने ही संधी आहे एकविसाव्या शतकाच्या आरशात स्वतःला व गांधी-विचारांना पारखून पाहण्याची. ह्या निमित्ताने गांधी-विचारांवर फसलेली काजळी पुसली जाईल, त्याचबरोबर सत्य-अहिंसा, अपरिग्रह अशा त्यांच्या तत्त्वांची पुनर्मांडणी केली जाईल. जागतिकीकरणाच्या रूपाने विकासाचे एकसाची प्रतिमान अमेरिकेपासून चीनपर्यंत लोकांना भुरळ घालत असताना त्यामुळे आपण आपली मुले-नातवंडे ह्यांच्यासाठी फक्त वैराण वाळवंटाचा वारसा शिल्लक ठेवणार आहोत हे भान जागविले जाईल. समतेचे मूल्य मानणाऱ्या सर्व विचारधारांशी संवाद करून एका व्यापक लढ्याची चाचपणी केली जाईल. ग्लोबल खेड्याचा भाग बनायच्या खटाटोपात शेजार व साथ  हरवलेल्या एकाकी माणसांना खरेखुरे नातेसंबंध जोडण्यास प्रवृत्त केले जाईल. मुख्य म्हणजे उद्याच्या जगाचे शिल्पकार असणाऱ्या तरुणांची गांधीच्या विचारांशी रुजवात करून दिल्या जाईल.

शनिवार १७ डिसेंबरला पुण्यात सुप्रसिद्ध विचारक व तिबेट सरकारच्या परागंदा सरकारचे माजी प्रधानमंत्री प्रा. रिम्पोचे  ह्यांच्या शुभ हस्ते गांधी-१५०च्या महाराष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ होत आहे. देशात, जगभरात, असंख्य माणसांच्या मनात ते पसरत जाईल आणि द्वेष-हिंसा, स्वार्थाने काळवंडलेल्या एकविसाव्या शतकात प्रेम, शांती व मानवतेचा प्रकाश उजळत जाईल, अशी आशा आपण ह्या प्रसंगी करावी काय?

ईमेल: ravindrarp@gmail.com

No comments:

Post a Comment