Blog Archive

Wednesday, 21 June 2017

#प्रश्न_१६- संमोहित व्यक्ती काही दिवसानंतर देसंमोहितखील संमोहनाचे आदेश आपोआप मानते असे आम्ही बघितले आहे. हे घडणे कसे शक्य आहे?

उत्तर- व्यक्ती ज्या वेळी गाढ संमोहन अवस्थेत असते त्या वेळी तिला सूचना दिलेल्या असतात, त्यातील काही सूचनांची अंमलबजावणी संमोहन निद्रा उतरल्यानंतर ठराविक काळाने करावयाची असते किंवा काही सूचनांचे परिणाम हे काही काळाने दिसणारे असतात. सूचना परिणामकारकपणे पोचल्या असल्यास हे घडून येते. मुद्दा स्पष्ट होण्यासाठी दोन उदाहरणे घेऊ. समजा, रात्री उशिरापर्यंत झोप न येणाऱ्या व्यक्तीस संमोहित अवस्थेत अशी सूचना देण्यात आली की रोज रात्री जेव्हा तू दहाचे ठोके ऐकशील वा घड्याळात दहा वाजलेले बघशील त्या वेळी तुला लगेचच गाढ झोप येईल. ही सूचना संबंधित व्यक्तीने स्वीकारलेली असेल, तर रोज रात्री जेव्हा ती दहाचे ठोके ऐकेल वा घड्याळात दहा वाजलेले बघेल त्या वेळी तिचे शरीर या सूचनेची अंमलबजावणी करावयास लागेल. तिला जांभया येऊ लागतील.
समजा, संमोहन निद्रेत अशी सूचना दिली की ‘उठल्यानंतर पंधरा मिनिटांनी तू ग्लासभर पाणी घेशील. त्यातले दोन घोट तोंडात टाकून बाकीचे फेकून देशील’ तर ती व्यक्ती संमोहनातून जागृत झाल्यानंतर पूर्णपणे पूर्ववत (नॉर्मल) वागेल परंतु पंधरा मिनिटांनी ती ग्लासभर पाणी मागेल. त्यातील दोन घोटच तोंडात टाकून बाकीचे फेकून देईल. गंमत म्हणजे ‘तू असे का केलेस?’ असे विचारले तर ‘मला अशी सूचना दिली होती’ असे ती अजिबात सांगणार नाही (कारण तिला ती त्या स्वरुपात आठवत नसते.) उलट ती तिला तिच्या बुद्धीला सकृतदर्शनी बरोबर दिसणारे काहीतरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल की पाणी मचूळ होते, अस्वच्छ होते वगैरे.
घड्याळ व तत्सम इतर कोणत्याही साधनांच्या मदतीशिवाय कालमापन बऱ्याच अचूकपणे करता येणे हा संमोहन अवस्थेत सूचना स्वीकारणाऱ्या मनाचा एक गुण आहे. तितक्या कालावधीनंतर ती सूचना प्रगट मनास पोचून कार्यान्वित होते. सूचना दिलेल्या क्षणापासून अमुक इतक्या मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, महिन्यांनी तुम्ही अमुक गोष्ट कराल अशी दिलेली सूचना अचूकपणे तेवढ्या कालावधीनंतर कार्यवाहीत येते. अर्थात, जी सूचना फक्त एकदाच अमलात आणावयाची असते. (उदा. ग्लासभर पाणी घेणे व दोन घोट घेऊन बाकीचे फेकून देणे) ती अमलात येणे सहज शक्य असते. दहाच्या ठोक्याला झोप येण्यासाठी सूचना ती स्वीकारली तरी तिचे सातत्य व प्रभाव टिकवण्यासाठी संबंधित व्यक्तीने संमोहनात जाऊन स्वतःला रोज ती सूचना देत राहावी लागते. अन्यथा गाढ संमोहन अवस्थेत स्वीकारलेल्या सूचनांची परिणामकारकता क्रमाक्रमाने कमी होत जाते. (या स्वरूपाच्या सूचना देतांना त्याबरोबर घ्यावयाची काळजीही सांगावयास हवी. उदाहरणार्थ, अशा व्यक्तीने रात्री दहा वाजता आपण वाहन चालवत असणार नाही वा रस्त्यातून चालत असणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. अन्यथा ठिकाणीच डोळ्यांवर झोप यावयास लागून अपघाताची शक्यता वाढेल).
मात्र संमोहित अवस्थेत जाणाऱ्या सर्वच व्यक्ती या स्वरूपाच्या (नंतर पार पाडव्याच्या) सूचना स्वीकारत नाहीत. तसेच ज्या व्यक्ती सूचना स्वीकारतात त्यांनाही त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी संमोहनाच्या अनेक सेशन्समध्ये या सूचना परत-परत देण्याची गरज असते.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार

No comments:

Post a Comment