Blog Archive

Wednesday, 13 July 2016

स्वतंत्र भारतात सैन्य आणि पोलीस यांची काय भूमिका असावी याबद्दल गांधीजींनी मांडलेले विचार

स्वतंत्र भारतात सैन्य आणि पोलीस यांची काय भूमिका असावी याबद्दल गांधीजींनी मांडलेले विचार -
---------------------
वृत्तपत्रांसारखीच आपल्या सैन्याची आणि पोलीसांची स्थिती आहे. फाळणीच्या वेळी सैन्य आणि पोलीस यांचेही विभाजन झाले होते. मला मान्य आहे की असे त्यांच्यामुळे झाले नाही, परंतु झाले. इथल्या सैन्यात हिंदू आणि शीख आहेत. मुसलमान सैनिक पाकिस्तानमध्ये गेले. हिंदू आणि शीख शिपाई जर असा विचार करू लागतील की आम्ही स्वतः हिंदू आणि शीख असल्यामुळे आमच्यावर केवळ हिंदूंना आणि शिखांना वाचवण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी केलेल्या अपराधाकडे आम्ही दुर्लक्ष केले पाहिजे आणि मुसमानांना तुमचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही असे म्हणतील तर आपण कुठलेच राहणार नाही. तसेच तुम्हाला वाचवणे आमचे काम नाही असे मुसलमान सैन्य आणि पोलीस हिंदूंना म्हणू लागले व त्यांना मारू लागले तर तेसुद्धा योग्य होणार नाही. सरकारजवळ सैन्य आणि पोलीस आहेत. परंतु मला ना तर सैन्याची गरज आहे ना पोलिसांची. तुम्हीच आपले पोलीस आणि सैनिक व्हा असे मी लोकांना सांगेन. इथे हिंदू जर मुसलमानांना मारत असतील तर त्यांना वाचवले पाहिजे. आपण त्यांना तसेच सोडून देऊ नये. मला जरी माझा जीव द्यावा लागला तरी मी एक पाऊलही बाजूला सरकणार नाही. माझे सरकार असे असेल. मी हवेत बोलत नाही आहे. काय बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. सरकारच्या सैन्याला आणि पोलिसांनाही मी असेच सांगेन. इथे राहणाऱ्या थोड्याशा मुसलमानांचे रक्षण करणे त्यांचे काम आहे. वेळप्रसंगी आपले प्राण देऊनही त्यांनी त्यांचे रक्षण केले पाहिजे. असे झाले तरच ते स्वतःला खरे पोलीस आणि सैनिक म्हणवू शकतील. भारताने मिळवलेले स्वातंत्र्य खरोखरच वेगळेच आहे. सर्व जग असे म्हणते आणि माझेही म्हणणे आहे की कोणत्याही सरकारने कधीही दुसऱ्या देशातील जनतेच्या अशा प्रकारे सत्ता सोपवली नाही. कोणत्याही प्रकारे भांडणतंटा न करता आणि रक्त न सांडवता आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. यामुळे आपले खिसे भरण्याकरिता सैन्याने आणि पोलिसांनी तिथे असू नये. जे मिळते त्यावर त्यांनी समाधान मानले पाहिजे. गोडधोड पदार्थांनी पुरेपूर महागड्या जेवणाचा त्यांनी विचार करू नये. जे कोणते जाडेभरडे अन्न मिळते त्यावर समाधान मानून सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. लोकांच्या मुलांना शाळाकॉलेजमध्ये जाताना पाहून, त्यांच्या मोटारगाड्या आणि सायकली पाहून अशाच गोष्टी मिळाव्या म्हणून तो जर भ्रष्टाचाराकडे वळत असेल तर तो खरा सेवक राहणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की खरा सैनिक आणि खरा पोलीस तोच असतो जे काही खायला मिळते त्यावर जो समाधान मानेल व धार्मिक पक्षपात न करता जो आपले कर्तव्य पार पाडेल. तो जर हिंदू असेल तर मुसलमानांना हानी पोहोचवण्याचा विचार त्याने करायला नको. मुसलमानाने जर गुन्हा केला असेल तर त्याला पकडून शिक्षा करणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतु इतर ठिकाणच्या मुसलमानांनी जघन्य अपराध केले आहेत म्हणून निष्पाप इथल्या मुसलमानाला शिक्षा केली पाहिजे काय? हिंदू जर मुसलमानाला इजा पोहोचवत असेल तर मुसलमानाला पकडणे पोलिसांचे कर्तव्य असेल. आपल्या दैशाचे सैन्य आणि पोलीस जर असे वागत नसतील तर ते आपल्या देशाच्या मिठाला जागले नाहीत असे म्हणावे लागेल.
पाकिस्तानमधील सैन्य आणि पोलीस यांच्याकरिताही मी हेच सांगेन. परंतु तेथील परिस्थितीबद्दल मी काहीही करू शकत नाही. मी कोणाला उद्देशून हे बोलू? परंतु मी सांगतो त्याप्रमाणे इथे घडले तर तिथेसुद्धा असेच घडल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला शंका नाही. आज लोकांचा तोल गेलेला आहे. ते म्हणतात की आमच्याच भाऊबंदांशी पाकिस्तानमध्ये दुर्व्यवहार केला जात असताना इथे आम्ही त्याचा बदला का घेऊ नये? परंतु असे बोलणे हे माणुसकीचे नाही. यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी शक्य तितक्या जोरात म्हणत राहीन की आपण स्वतःला शुद्ध ठेवले पाहिजे, आपण चांगले राहिलो पाहिजे, आपली वृत्तपत्रे, आपले सैन्य, आपले पोलीस या सर्वांनी चांगले राहिले पाहिजे. याशिवाय आपले सरकार काम करू शकणार नाही आणि आपला विनाश होईल. पाकिस्तानमध्ये काहीही घडले तरी आपण सुसंस्कृत राहिलो पाहिजे. कमीतकमी इतके तरी करा. तुम्ही जर माझे ऐकणार नाही तर आपल्या सर्वांचा विनाश होईल हे मी तुम्हाला सांगून ठेवतो.
हिंदीवरून. प्रार्थना प्रवचन - १, पृष्ठ ३९१-९८
---------------------
अनुवाद - ब्रिजमोहन
ऑक्टोबर ८, १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९७, पृष्ठ ५८-५९, संगणकीय आवृत्ती

No comments:

Post a Comment