Blog Archive

Monday, 29 May 2017

पायथागोरस हा हिंदूच

*🚩जयतु हिंदू राष्ट्रम🚩*
राष्ट्रीय ग्रंथ श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जूनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस! पण प्राकृत भाषेत या संस्कृतोद्भव शब्दांतील काठीण्य तालव्य व्यंजन "र" चा -हास होउन तो उच्चार  पायथागोरस असा  झाला. हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजन विदेशी म्हणून हिणवू लागले. तेव्हा अर्जूनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय  दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.  " पार्थागोरस, तू आणि मी पांडव  असूनही  एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे " कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द , पायथागोरस च्या मनावर लहानपणीच कोरले गेले . त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून  पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला. त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले . त्याच्या या सिद्धांताचे विचार वर्तुळ व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे पृसृत झाला. कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो मोठा गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला. कृष्णाच्या हातून मोक्षप्राप्ती होत असताना  कंसाची ईच्छा प्रकट केली  होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात कंस वापरतात. यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिद्ध होते.पायथागोरस बद्दल पुण्यातील गौरी शिंदे  आणि   काही इतर  विद्वान संशोधकांच्या म्हणण्यानुसार पायथागोरस हा पुण्यनगरी म्हणजेच पुणे शहराचा मूलनिवासी होता .  त्याच्यासारख्या विद्वज्जनाला राहायला योग्य असे स्थान होते कुठे दुसरे भारतात! त्याला पुण्यातला  गो-रस प्राशन करायला प्रचंड आवडायचा. आता गो-रस म्हणजे गोमुत्र , दूध कि मांस-रस ह्याबाबत संभ्रम आहे आणि त्यावर संशोधन हि चालू आहे . परंतु पुण्यनगरीतील पर्वती टेकडीच्या पायथ्याला त्या काळी मिळणारा गो-रस अत्यंत रुचकर असल्याने त्याला अतिशय प्रिय होता तो. गो-रसाचे सेवन करण्यासाठी तो वारंवार पार्वती पायथ्याला जाऊन बसायचा..त्याचे हे वेड इतके वाढले कि शेवटी तो "पायथागोरस" ह्या नावानेच ओळखला जाऊ लागला. या विषयी अधिक संशोधन अद्याप सुरु आहे.

http://m.timesofindia.com/india/Pythagorass-theorem-actually-an-Indian-discovery-Harsh-Vardhan/articleshow/45746060.cms
🚩जयतु हिंदू राष्ट्रम🚩
एक पाऊल विकासाकडे, एक पाऊल हिंदू राष्ट्राकडे
चला सत्य सर्वांपर्यत पोहचवूया

संशोधन- इतिहासाचार्य श्री श्री राज कुलकर्णी

No comments:

Post a Comment